29/11/2025
विवेकानंदांनी सर्वधर्मपरिषदेत ‘सिस्टर्स ॲन्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ हे शब्द उच्चारले. त्यांचं मोठेपण फक्त या शब्दांत आहे अशी सर्वसामान्य समजूत आहे. खरंतर ही त्यांच्या महान कार्याची सुरुवात आहे.
भारताचं पुनरुत्थान आणि अद्वैत वेदांत विचाराचा प्रसार अशी दुहेरी जबाबदारी गुरु श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेताना तरुण नरेंद्राच्या शिरावर ठेवली. हे कार्य पूर्ण करीन तेंव्हाच परत येईन अशी प्रतिज्ञा करून नरेंद्रानं प्रथम भारतभ्रमण केलं, कन्याकुमारीच्या श्रीपादशिलेवर तीन दिवस अखंड ध्यान केलं.
कार्याची सुरुवात अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेत हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जाऊन करायचं ठरवलं. स्वामी विवेकानंद हे नाव त्यानं धारण केलं. विश्वधर्म स्थापन करण्याची जगाला नितांत गरज आहे आणि ही ताकद फक्त हिंदू धर्मातील वेदांत विचारात आहे याचं ठोस प्रतिपादन त्यांनी जगासमोर केलं.
अमेरिका, इंग्लंड या देशांत शेकडो व्याख्याने, वेदांताचे वर्ग, मेळावे, ग्रंथलेखन, वेदांत सोसायटीची स्थापना, अनेक शिष्यांना दीक्षा असे कार्य करून साडेतीन वर्षांनी स्वामीजी भारतात परत आले. श्रीरामकृष्णांची ‘शिवभावे जीवसेवा’ ही शिकवणूक सर्वदूर पोचवण्यासाठी रामकृष्ण संघाची स्थापना केली.
या शिवस्वरूप महात्म्याने पंधराशे वर्ष मानवाला पुरेल एवढं विचारधन मागे ठेवलं. या सर्व प्रवासात रामकृष्ण आणि शिव यांच्या सान्निध्याची त्यांना सतत जाणीव होत राहिली. अखेर आपलं जीवितकार्य संपवून वयाच्या चाळीसाव्या वर्षी ते शिव आणि रामकृष्ण यांच्यात विलीन झाले. त्याची ही कहाणी!