03/06/2026
तुकोबांचा पंथ सर्वमान्य व कार्यक्षम झाला. सनातन धर्मातच जगू व वाढू शकला. याचे कारण एकच आणि ते म्हणजे तुकोबांनी पंथाच्या अगर सांप्रदायाच्या श्रेष्ठाश्रेष्ठतेच्या व भेदाभेदाच्या भांडणांत न शिरता, आहे त्याच स्वधर्मात, सुलभ आणि सर्वास व सर्रास मोकळे असणाऱ्या व सहज पचनी पडणाऱ्या साधनमार्गाचे महत्त्व जनतेत ठसविले, सामान्य जनाप्रमाणेच थोर संतांना इतकेच नव्हे तर सुधारणावादी नेत्यांनाही तुकोबांचा साधनमार्ग आज शेकडो वर्षांनंतरही पुरोगामी वाटला. हेच त्यांच्या अमर कीर्तीचे व महतीचे मुख्य कारण होय. तुकोबांनी आपल्या या श्रेष्ठ ज्ञानाचा ज्या गीताशास्त्रावर पाया रचला ती गीता त्यांस सापडताच ज्या शब्दात त्यांनी जनताजनार्दनास अर्पण केली त्याच शब्दांत त्यांच्या ज्या गीतानुवादाचा सांप्रत विसर पडला आहे, तो आज तीनशे वर्षांनी जनताजनार्दनास प्रेमभावाने सादर करीत आहे: “परि ईश्वराकरितां। मज सांपडली गीता ॥१०॥ तिच्या संगें अंगिकार केला तरी द्यावा थार ॥११॥” - वा.सी.बेंद्रे