Shetijanya

Shetijanya Toxin-free fruit, exploitation-free farmers. Shetijanya will continue to act as a new bridge between farmers and consumers.

24/05/2022
'शेतीजन्य प्रस्तुत द्राक्ष महोत्सव'असं म्हणत कृषी उत्पादन विक्री उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झाले. शेतीजन्यचा जन्म करोनाच...
20/03/2022

'शेतीजन्य प्रस्तुत द्राक्ष महोत्सव'

असं म्हणत कृषी उत्पादन विक्री उपक्रमाला आज एक वर्ष पूर्ण झाले. शेतीजन्यचा जन्म करोनाच्या टाळेबंदीत वृत्तसंकलन करत असताना झाला. मुरबाड तालुक्यातही हापूस आंबा पिकतो आणि तोही दर्जेदार हे २०२० मध्ये पहिल्यांदा समजलं. टाळेबंदीत महामार्ग बंद असल्याने आंबा विक्री ठप्प आहे. त्यामुळे फक्त बातमी करू नका साहेब, आंबा विकायला मदत करा अशी भावनिक विनंती नथ्थू पारधी यांनी केली. हे ऐकून आम्ही चारही पत्रकार पेटून उठलो. चंद्रशेखर भुयार सरांनी त्या शेतकऱ्याचे आवाहन करणारा व्हिडीओ चित्रित केला, प्रशांत मोरे सरांनी भावनिक पोस्ट लिहली. मी आणि गिरीश त्रिवेदी यांनी ही पोस्ट व्हायरल केली. मग अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कल्याण, डोंबिवली अशा सर्व शहरातून भरभरून मेसेज येऊ लागले. आंबे हवेत, कोणते आहेत, मदत करायची आहे, पत्ता द्या असे अनेक मेसेज आले. मग जबाबदारी वाढली. मग आंबे द्यायचे कसे याबाबत सर्व चर्चा करू लागलो. मग ठरलं की बाजारात ज्याप्रमाणे हापूस विकला जातो तसाच विकायचा. मग खोका कंपनी शोधली. टाळेबंदीत सर्व बंद असताना ते शोधायचे कुठे हा प्रश्न होताच. उल्हासनगर शहर अशा सर्व मागणीला कायमच पुरून उरत असतं. वरप गावात असलेल्या खोका कंपनीचा संपर्क मिळाला. या सिंधी बांधवानेही आदिवासी बांधवांना तात्काळ मदत करण्यासाठी बॉक्स तयार करून देण्याची तयारी दर्शवली. त्या काळात बाजार बंद असल्याने मागणी घटली होती. अशावेळी मोजक्या ऑर्डर घेणे परवडत नव्हते. मात्र यात व्यवसाय नव्हता, त्यामुळे त्यांनीही दरात कपात करून बॉक्स दिली. स्वतःची आंब्यांची ऑर्डरही दिली. दिवस ठरला आणि आम्ही जयंत कदम यांचा टेम्पो घेऊन मुरबाडच्या फांगणे जवळील करपटवाडी या आदिवासी वाडीत पोहोचलो. बॉक्समध्ये आंबे भरण्याचा अनुभव ना आम्हाला होता ना पारधी कुटुंबियांना. पण ज्याप्रमाणे आपल्याला आंब्याची पेटी मिळते तशीच आपण द्यायची हे ठरवलं होतं. आंब्याच्या पेट्या खूप उघडल्या, पण पहिल्यांदाच पेट्या भरायच्या होत्या. मग काय झोपडीवजा कौलारू मातीच्या घरात सर्व अविर्भाव घडी करून बसकन मारली. डझनाच्या हिशेबाने पेट्या भरल्या. दुपारी ११ ला सुरू झालेले काम सायंकाळी ५ च्या सुमारास संपले. पेट्या भरल्या, टेम्पोत टाकल्या आणि वेळ आली पेट्यांचा हिशेब देण्याचा. व्यापारी नसल्याने आणि भावनिकतेतून हा उपक्रम करत असल्याने सर्व आंब्याचे पैसे आगाऊ द्यायचे ठरवले होते. त्यासाठी यथाशक्ती खिसा रिकामा केला होता. आदिवासी बांधवांचे सुमारे अडीचशे पेट्या म्हणजे हजार किलो आंबे एकाच दिवसात विकले गेले होते. जवळपास दोन महिने कल्याण अहमदनगर राज्यमार्गावर भर उन्हात रस्त्याच्या कडेला बसून आंबे विक्री करणाऱ्या पारधी कुटुंबासाठी हा वेगळाच व्यवहार होता. त्यांनी आयुष्यात एवढी रक्कम एकावेळी पाहिली किंवा स्वीकारली नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर खूप काही मिळाल्याचा जो आनंद दिसला तो अवर्णनीय असा होता. त्यांचे चेहरे पाहून जे समाधान मिळाले ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही.
टेम्पो घेऊन सायंकाळी अंबरनाथ गाठले. गिरीश त्रिवेदी यांचे घर शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही ऐसपैस आहे. त्यांच्याच घरी पेट्या उतरवल्या. दुसऱ्या दिवसापासून वितरण सुरू झाले. अवघ्या एका दिवसात सर्व पेट्या हातोहात खपल्या. ना नफा ना तोटा संकल्पनेतून राबवलेला आदिवसींसाठीचा हा उपक्रम यशस्वी झाला.

या उपक्रमाला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अशा सर्व शहरातील सुजाण ग्राहकांनी प्रतीसाद दिला. त्यानंतर २०२१ या वर्षात दोन ते तीन जातींचे आंबे मोठ्या प्रमाणावर वितरित केली. अनेक जवळच्या व्यक्तीं मग त्या सर्वच क्षेत्रातील असो, सर्वांनी ही संकल्पना डोक्यावर घेतली. हे कायमस्वरूपी करावे असे सुचवले. काहींनी आग्रह केला, अनेकांनी आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दाखवली. अनेकांनी जागा, वाहन देण्याची घोषणा केली. मात्र पत्रकारिता सांभाळून हे करता येईल का या संभ्रमात होतो. अखेर काही महिने गेल्यावर आणि जिल्ह्यातील शेती क्षेत्राशी जवळीक वाढल्याने अखेर हा उपक्रम नियोजनबद्ध आणि सातत्याने करण्याचे ठरले. आपल्या समूहाला एक नाव देण्याबाबत चर्चा सुरू झाली. प्रशांत मोरे सरांनी अचानक एके दिवशी चंद्रशेखर भुयार यांच्या गाडीतून फिरत असताना एक शब्द उच्चारला. 'शेतीजन्य'. कसे वाटते हे नाव.
अगदी दुसऱ्या मिनिटाला सर्वांनी शब्दाला मंजुरी दिली. आणि सुरू झाला *शेतीजन्य*चा प्रवास.

तालुक्यात, जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात काय पिकते, काय विकते, कसली गरज आहे, काय अडचणी आहेत हे सर्व अभ्यासू लागलो. अंबरनाथ तालुका कृषी सहायक सचिन तोरवे आमचे प्रमुख मार्गदर्शक. वांगणीचे प्रयोगशील शेतकरी गणेश देशमुख, कृषितज्ज्ञ राजेंद्र भट, तत्कालीन कृषी अधिकारी, कृषी अधीक्षक आमचे कायम मार्गदर्शन करत राहिले. अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या आमच्या पाठीशी या काळात उभ्या राहिल्या.

जानेवारी २०२१ मध्ये द्राक्ष महोत्सव करण्याची कल्पना सुचली. निर्यात बंद झाल्याने उत्तम दर्जाचा थॉम्पसन जातीचा द्राक्ष पडून असल्याची माहिती गणेश देशमुख यांनी दिली. त्यानुसार थेट नाशिक जिल्ह्यातील मोहाडी गाव गाठले. जाधव वस्तीत मयूर जाधव आणि कुटुंबियांची भेट घेतली. शेतकऱ्याकडे पैसा नसला तरी त्याचे मन खूप मोठे असते याचा प्रत्यय जाधव कुटुंबियांना भेटून आला. द्राक्ष बाग फिरून, द्राक्षांची चव चाखून हेच द्राक्षे शहरात विक्रीसाठी न्यायची हे ठरवलं. मग मयूर जाधव आणि त्यांच्या बंधूंची छोटेखानी मुलाखत करून परतलो.

एखादा महोत्सव करायचा म्हटलं की खर्च, नियोजन आणि मनुष्यबळ लागणारच. अशावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना यात सहभागी करण्याचा निर्णय झाला. बदलापूरात स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचे ठरले. भाजपचे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना ही संकल्पना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता घोरपडे साहेबांनी जागा, दिवस आणि काय करायचं एवढं सांगा, अस बोलून कार्यक्रम निश्चित केला. बदलापुरात पश्चिमेला आणि पूर्वेला अशा दोन ठिकाणी कार्यक्रम ठरला. अंबरनाथ शहरात शिवसेनेचे नगरसेवक आमचे मित्र पुरुषोत्तम उगले, भाजपचे पदाधिकारी आणि मित्र सर्जेराव माहुरकर यांचे कार्यालय आणि गिरीश त्रिवेदी यांच्या घरून विक्री करायचे ठरवले.
२० मार्च, सकाळी दहाच्या सुमारास बदलापूर पश्चिमेतील सूर्योदय नगरच्या नाल्याजवल भव्य मंडपात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत द्राक्ष महोत्सवाचे उदघाटन झाले. तासाभरात पूर्वेतील उड्डाणपुलाच्या खाली दुसऱ्या केंद्राचे उदघाटन झाले. दोन्ही ठिकाणी काही मिनिटातच सुमारे एक हजार किलो द्राक्ष संपली. संध्याकाळी अंबरनाथचे केंद्र सुरू होण्यापूर्वी बदलापुरात द्राक्ष संपली होती. संध्याकाळी पुरुषोत्तम उगले यांच्या कार्यालयात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. आणि काही तासातच अंबरनाथ शहरात सुमारे एक हजार किलो द्राक्षे तीन केंद्रावरून संपली. कल्याण, डोंबिवली या भागातील द्राक्ष पेट्या आम्ही स्वतः नेऊन पोहोचवल्या. एक दिवसात अडीच हजार किलो द्राक्ष संपली याचे आश्चर्य वाटत होते.

पण समाधान या गोष्टीचे होते की अडचणीत आलेल्या किमान एका द्राक्ष उत्पादक शेतकरी कुटुंबाला मदत केली. समाधान याचे होते की आपलं दरात निर्यात दर्जाची द्राक्षे आपल्या भागात उपलब्ध करून दिली.

गेल्या वर्षात सुरू झालेल्या शेतीजन्यच्या या प्रवासाला आज *एक वर्ष* पूर्ण होत आहेत. या प्रवासात आपल्या सर्वांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भरपूर मदत झाली. द्राक्षानंतर त्याचेच मनुकेही सुमारे ६०० - ७०० किलो विकले गेले. गेल्या दोन महिन्यात कोणतीही जाहिरात न करताही इंद्रायणी, आंबेमोहोर असा दर्जेदार आणि अस्सल तांदूळ वाजवी किमतीत उपलब्ध करून दिला. दर्जेदार शेती उत्पादन पुरवण्यासोबतच शेतीजन्यने अंबरनाथ, डोंबिवली या शहरांमध्ये सांस्कृतिक आणि वाचन चळवळीला हातभार लावण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या मदतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुस्तक प्रदर्शनही भरवले. अवकाळी पावसाने यंदाच्या द्राक्ष महोत्सवावर पाणी फिरवले. आर्थिक नुकसान झाले. पण आम्ही हरलो नाही. लवकरच शेतीजन्य आपले स्वतःचे नवे विक्री केंद्र अंबरनाथ शहरात सुरू करत आहे. येत्या काही दिवसात त्याचे लोकपर्ण होईल. शेतीजन्य आपल्या आसपासच्या शेती, शेतकरी, त्यांच्या कथा , व्यथा घेऊन संकेतस्थळ आपल्या भेटीला आणत आहे.

तर आजच्या शेतीजन्य समूहाच्या उपक्रम वर्धापनदिन दिवसाचे औचित्य साधून एक ते दीड वर्षांचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या शुभेच्छा आणि पाठींबा कायम ठेवा हीच विनंती.

धन्यवाद
सागर नरेकर, टीम शेतीजन्य
२०-०३-२०२२

11/03/2022

*अवकाळी पावसाने बागांचे नुकसान*
*द्राक्ष महोत्सव रद्द*
------------------
गुरूवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील (मोहाडी) द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षांची वाताहात झाली आहे. आम्ही ज्या शेतकऱ्यांकडून द्राक्ष आणतो, त्यांच्याही द्राक्ष बागेला फटका बसला.
त्यामुळे येत्या *शनिवार, रविवारी (12 आणि 13 मार्च)* रोजी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये नियोजित केलेला *द्राक्ष महोत्सव रद्द करावा लागत** *आहे याची कृपया नोंद घ्यावी.*
पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल.
--------------
शेतीजन्य समूह

-------------------

23/02/2022

चुकवू नये असा कार्यक्रम
डोंबिवलीत सजणार अर्थपूर्ण शब्दांची सुरेल माळ
सादरकर्त्या: धनश्री लेले, शुक्रवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता.
स्थळ: ग्रंथोत्सव, के. बी. विरा शाळेचे पटांगण.

सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा : दा. कृ. सोमणदा. कृ. सोमण यांनी उलगडली आकाशातील आश्चर्ये शेतीजन्य |डोंबिवली...
21/02/2022

सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा : दा. कृ. सोमण
दा. कृ. सोमण यांनी उलगडली आकाशातील आश्चर्ये

शेतीजन्य |डोंबिवली
अशक्य हा शब्द विज्ञानात नाही आणि जगात चमत्कार नावाची गोष्ट नाही. चमत्कारामागचे विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केले. आकाशातील दहा आश्चर्यांमागचे वैज्ञानिक सत्य दा. कृ. सोमण यांनी अतिशय सोप्या भाषेत समजाऊन दिले.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवली शिवसेना शहर शाखा आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेकडील के.बी. विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात दा. कृ. सोमण यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात दा. कृ. सोमण यांनी वरील प्रतिपादन केले. विद्या निकेतन शाळेचे विवेक पंडित, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, महिला आघाडीच्या वैशाली दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वयाची ८० वर्षे पूर्ण केली तसेच पंचांग आणि खगोल अभ्यासाची पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना डोंबिवली शहर शाखा, शेतीजन्य आणि साहित्ययात्रा यांच्या तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, महावस्त्र, पुस्तक आणि श्रीफळ देऊन दा. कृ. सोमण यांचा सन्मान करण्यात आला. अमेय रानडे यांनी सूत्रसंचालन केले.
जगभरातून काही जण भीतीदायक अफवा पसरवीत आहेत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे कळकळीचे आवाहन दा. कृ. सोमण यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच केले. लघुग्रह आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणार, लवकरच जगबुडी होणार, चंद्रावरचे प्लॅाटस् खरेदी करता येतील, जन्मराशीप्रमाणे आकाशातील तारकांना तुमचे नाव दिले जाते अशा अनेक अफवा पसरविल्या जाऊन वेगळाच व्यवसाय सुरु झाला आहे असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
आश्चर्य वाटेल असेल अशा घटना असंख्य आहेत. हे विश्व १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून निर्माण झाले आहे. हे विश्व विस्तारत आहे. महास्फोटानंतर अवकाश-स्पेस, काल-टाइम आणि वस्तू- मॅटर निर्माण झाले. या विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. यामध्ये आपली आकाशगंगा आहे आणि या आकाशगंगेत आपली सूर्यमाला असून त्यात आपली पृथ्वी आहे. या विश्वात आपले जीवन नगण्य आहे. आपण काही काळापुरते पृथीवर आलेले पाहुणे आहोत. आपण त्याचे मालक नाहीत असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी जन्मला असून अजून पाच अब्ज वर्षे राहणार आहे. म्हणून घाबरू नका. सूर्यावर दर सेकंदाला ६३ कोटी हैड्रोजनचे ज्वलन होते. हैड्रोजनचे हिलीयममध्ये रूपांतर होते. सौरडाग दर ११ वर्षांनी वाढतात. आपला सूर्य आकाशगंगेच्या मध्यापासून २७ हजार २०० प्रकाशवर्ष अंतरावर राहून दर सेकंदास २२० किमी. या वेगाने आकाशगंगेच्या मध्याभोवती प्रदक्षिणा करतो. २५ कोटीवर्षात त्याची एक प्रदक्षिणा होते. आत्तापर्यंत सूर्याने २० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किमी. अंतरावर आहे. चंद्र पृ्थ्वीवर आदळणार नाही. उलट पृथ्वीवरील सागराला येणा-या भरती-ओहोटीमुळे चंद्र दरवर्षी ३.८ से. मीटरने दूर जात आहे. चंद्रावरून आकाश काळे दिसते. सूर्य, पृथ्वी, ग्रह-तारका दिसतात. पृथ्वी चंद्राच्या चौपट आकाराची दिसते. चंद्राची सफर दा. कृ. सोमण यांनी यावेळी उदाहरणे देऊन घडविली. पृथ्वीवर पौर्णिमा असते त्यावेळी चंद्रावर अमावास्या असते आणि पृथ्वीवर अमावास्या ती चंद्रावर पौर्णिमा. ज्याचे पृथ्वीवर ६० किलो वजन त्याचे चंद्रावर १० किलो वजन होईल. चंद्रावरून सूर्यग्रहण व पृथ्वीग्रहणे कशी दिसतील ते दा. कृ. सोमण यांनी समजाऊन सांगीतले.
खग्रास व कंकणाकृती सूर्यग्रहणे. १६ फेब्रुवारी १९८० रोजी दा. कृ. सोमण यांनी पाहिलेल्या पहिल्या खग्रास सूर्यग्रहणाचे वर्णन त्यांनी या वेळी केले. यापुढील भारतातून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण २० मार्च २०३४ रोजी काश्मीर मध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रातून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण १८ सप्टेंबर २२४८ रोजी होणार आहे. भारतातून दिसणारे यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातून ३ नोव्हेंबर २४०४ रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
१७ नोव्हेंबर २००० रोजी ताशी चारशे उल्का पडतांना पहायला मिळाल्या. तसा लिओनिड मोठा उल्कावर्षाव दर ३३ वर्षांनी दिसतो. उल्का आणि अशनी यातील फरक दा. कृ. सोमण यांनी यावेळी सांगितले. लघुग्रह पृथ्वीवर आदळणे तसे क्वचित घडते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये डायनोसॅार मृत्यू पावले. १९०८ मध्ये रशिया सैबेरियात तुंगस्का येथे अशनीपाषाण आदळला होता. ५२ हजार वर्षांपूर्वी लोणार येथे अशनीपाषाण आदळला. यावेळी दा. कृ. सोमण यांनी लोणारचे दर्शन अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. सर्वानी एकदा तरी लोणारला जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आग्रही आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले. ६० मीटरचा अशनीपाषाण आदळण्याची घटना ३०० वर्षात घडते. १०० मीटरचा ५ हजार वर्षात, १ कि.मीचा ३ लक्ष वर्षात आदळण्याची शक्यता असते. १० किमी आकाराचा १० कोटी वर्षात आदळू शकतो. अशा घटना क्वचित घडतात. त्यामुळे कोणीही चिंता करू नये असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
परग्रहावरची जीवसृष्टी याविषयी प्रत्येकाला कुतुहल असते. अजूनपर्यंत एलियन्स पृथ्वीवर आलेले नाही. पण इतर सूर्यमालेतील इतर ग्रहांवर जीवसृष्टी असू शकेल. अंतरे खूप असल्यामुळे अजून संपर्क साधतां येत नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सोमण यांनी पाहिलेल्या धूमकेतूंचे वर्णन केले. हॅले धूमकेतूची सविस्तर माहिती त्यांनी दिली. स्वीफ्ट टटल धूमकेतू १४ ॲागस्ट २१२६ रोजी पृथ्वीवर आदळेल असे शास्त्रज्ञांना पूर्वी वाटले होते. पण त्याच्या मार्गात आता बदल होत आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. तसे होण्याची शक्यता निर्माण झाली तर धूमकेतूचा मार्ग बदलणे शक्य होईल असा विश्वास दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केला. भविष्यात अवकाश सहल शक्य होईल. शून्य गुरुत्वाकर्षणात राहणे, अवकाशातून पृथ्वीदर्शन घेणे, अंतराळ स्थानकात राहणे आणि हनिमूनसाठी प्रत्यक्ष चंद्रावर जाणे सहज शक्य होईल असे त्यांनी सांगितले.
आपले जीवन आकाशातील ग्रहांवर नाही तर माणसाच्या मनातील आग्रह, विग्रह, अनुग्रह, संग्रह, पूर्वग्रह इत्यादी ग्रहांवरच अवलंबून असते असे सांगून, पुढच्या शंभर वर्षात आश्चर्यकारक शोध लागणार आहेत. मेडिकल शास्त्रात जबरदस्त शोध लागणार आहेत. संगणक क्षेत्रात तर अनेक शोध लागून माणसाचे जीवनच बदलले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील शोधांची माहिती त्यानी दिली. शास्त्रज्ञांनी असे एक इंजेक्शन शोधून काढावे की ते दिल्यावर माणसे माणसासारखी वागतील अशी इच्छा दा. कृ. सोमण यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी व्यक्त केली.
डॉ. राणी दुष्यन्त खेडीकर यांनी लिहिलेल्या आणि ग्रंथालीने प्रकशित केलेल्या "लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण" या पुस्तकाचे दा. कृ. सोमण यांचे हस्ते प्रकाशन यावेळी करण्यात आले. ग्रंथालीचे प्रभाकर भिडे, डॉ. राणी दुष्यन्त खेडीकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
#डोंबिवली #डॉश्रीकांतशिंदेफाऊंडेशन #दाकृसोमण #ग्रंथोत्सव #ग्रंथाली

आकाशातील आश्चर्ये उलगडणारदा.कृ.सोमण यांचे डोंबिवली ग्रंथोत्सवात व्याख्यान शेतीजन्य | डोंबिवली: जमिनीवर राहणाऱ्या प्रत्ये...
19/02/2022

आकाशातील आश्चर्ये उलगडणार
दा.कृ.सोमण यांचे डोंबिवली ग्रंथोत्सवात व्याख्यान

शेतीजन्य | डोंबिवली: जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आकाशाबद्दल कमालीचे आकर्षण असते. याच कुतुहलातून विकसीत झालेल्या खगोल विज्ञानाने आकाशातील अनेक रहस्ये मानवाला समजली. रविवारी, २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली येथील के.बी.विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण आकाशातील निवडक दहा आश्चर्यांचा उलगडा करणार आहेत.

साहित्ययात्रा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवातील हा दुसरा कार्यक्रम आहे. त्यात दा.कृ.सोमण खगोल विज्ञानाने समजलेली आकाशातील रहस्ये सांगणार आहेत. हे विश्व कधी व कसे निर्माण झाले ? सूर्य कसा आणि कधी निर्माण झाला ? तो थंड कधी होणार. मग मानवाचे काय होणार ? चंद्र नसता तर ? चंद्र पृथ्वीवर आदळेल का ? उल्कावर्षावाच्या चित्तथरारक रात्री. लघुग्रह पृथ्वीवर आदळून जीवसृष्टी नष्ट होईल असे नासा सांगते. मग तसे का घडत नाही ? परग्रहावर जीवसृष्टी आहे का ? एलियन्स पृथ्वीवर खरोखरच आले आहेत का ?
भविष्यातील स्पेस टुरीझम कसे असेल ? आकाशातील ग्रह गोलांचा आपल्यावर परिणाम होतो का ? आदी प्रश्नांची उत्तरे दा.कृ.सोमण देतील. रविवार, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून हा कार्यक्रम रंगेल. तर २७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत पुस्तक प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

-------------------
‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’
पुस्तकाचे प्रकाशन

याच कार्यक्रमात दा.कृ.सोमण यांच्या हस्ते ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’ या डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ग्रंथालीच्या वतीने हे पुस्तक प्रकाशीत होत असून ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलापूरकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
-----------------

डोंबिवलीकरांनी अनुभवले स्रीधनाचे महात्म्यदीपाली केळकरांनी उलगडली ओवी, म्हणी, उखाण्यांची गोष्टशेतीजन्य | डोंबिवलीः शिक्षण...
14/02/2022

डोंबिवलीकरांनी अनुभवले स्रीधनाचे महात्म्य

दीपाली केळकरांनी उलगडली ओवी, म्हणी, उखाण्यांची गोष्ट

शेतीजन्य | डोंबिवलीः शिक्षणाचा अधिकार नसताना अखंड लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्त्रियांनी आपल्या भावभावनांना ओव्या, म्हणी आणि उखाण्यांतून वाट मोकळी करून दिली होती. खऱ्या अर्थाने चारोळ्या, विनोदी कवितांच्या जनक महिलाच असून त्यांनीच बहुतांश बडबडगीते रचली. मराठी भाषेतील स्त्रियांच्या सृजनशिलतेचे हे दर्शन रविवारी डोंबिवलीकरांनी अनुभवले. डोंबिवलीतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात आयोजित ग्रंथोत्सवात लेखिका आणि निवेदिका दीपाली केळकर यांनी स्त्रीधन हा कार्यक्रम सादर केला.

साहित्यायात्रा, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात 4 फेब्रुवारीपासून ग्रंथ प्रदर्शनाचे सुरू आहे. येत्या 27 फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा दिनापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील रविवार 13 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका दीपाली केळकर यांचा स्त्रीधन हा कार्यक्रम पार पडला. महिलांना निर्मिलेल्या आणि मौखिक परंपरेने जंपलेल्या अक्षर श्रीमंतीची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी मांडली. एकेकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना अनेक अधिकारही नव्हते. अखंड लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्रियांनी आपल्या भावभावना ओव्या, म्हणी आणि उखाण्यांतून मांडल्या, असे सांगत दीपाली केळकर यांनी स्त्रियांचे अनुभवविश्व उलगडले. स्त्रियांनी स्वःतचे मन रमविण्यासाठी विचारांना ओवीबद्ध केले. आपल्या भावभावना नेमक्या आणि अचून शब्दात मांडणे म्हणजेच ओवी. त्यामुळे बहुतेक सर्व संत साहित्य ओवीच्या रूपानेच आपल्यापर्यंत आले असे सांगत स्त्रियांच्या सृजनशिलतेचे महत्व केळकर यांनी यावेळी पटवून दिले. महिलांनीही त्यांच्या विचारांना वाट मोकळी करून देण्यासाठी ओवी, म्हणी आणि उखाण्यांचा आधार घेतला आणि त्यांचे जगणे सुसह्य झाले. कौटुंबिक ताणतणाव दूर करण्यासाठी स्रियांना कोणत्याही मानसोपचार तज्ज्ञाची गरज पडली नाही, असेही केळकर यावेळी म्हणाल्या. आपल्या मनात आलेले सारे विचार त्या जात्याजवळ बोलून मोकळ्या होत होत्या. चारोळ्या आणि विनोदी कविता या साहित्य प्रकाराच्या आद्यजनक महिलाच आहेत. बहुतेक सारी बडबडगीते स्त्रियांनीच रचली आहेत, असेही केळकर यांनी सांगितले.

ओव्या, म्हणी आणि उखाण्यांची महती सांगतांना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. ‘आला आला रुखवत, त्यात होती तुरी, नवरी दिसली बरी पण नांदल तवा खरी’ हा रूखवत सादर करत्या वेळी सादर केला जाणारा उखाणा त्यांनी कसा चपखल बसतो हे सांगितले. पीठ देणाऱ्या जात्याला घरोट म्हणणाऱ्या बहिणाबाईंच्या कवितांचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. पुरूष प्रधान संस्कृतीत मिळणाऱ्या दुजाभावाबाबत स्त्रियांच्या मनात असलेली चीड अनेक ओव्यांमधून व्यक्त झाली आहे. साक्षात देव आणि संतांनाही स्त्रियांनी सोडले नाही असे सांगत ‘राम म्हनू राम, नाही सीतेच्या तोलाचा... सीता माझी हिरकणी राम हलक्या दिलाचा.’ आणि ‘तुका निघाले वैकुंठी, वस्त्रे ठेवली खुंटीवरी, जिजा निघाली माघारी, सोताच्या हिंमतीवरी’ या ओवी सादर केल्या. झोका खेळताना आपल्या मैत्रिणीला तीच्या स्थुलतेबाबत सांगणाऱ्या एका तरूणीच्या भावना तिने ‘ओवा बाई ओवा रानोमाळ ओवा माझ्यासंग फुगडी खेळतो गणपती बोवा’ या ओवीतून अचूकपणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले. पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही प्रकारचे हुमाण म्हणजे कोडी घालून दीपाली केळकर यांनी कार्यक्रमात रंगत आणली. अचूक उत्तर देणाऱ्या श्रोत्यांना त्यांनी पुस्तके भेट दिली. सव्वातास सुंदररित्या रंगलेल्या या कार्यक्रमाच्या अखेरीस राष्ट्रीय महिला दिनाचे- म्हणजेच सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनाचे स्मरण केळकर यांनीकेले. या कार्यक्रमाला डोंबिवलीकर रसिकांना भरगच्च प्रतिसाद दिला. डोंबिवलीकर डॉ. सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परूळेकर, दीपाली काळे आदी मान्यवर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
#डोंबिवली #डॉश्रीकांतशिंदेफाऊंडेशन #ग्रंथप्रदर्शन #मराठी #ग्रंथ #दीपालीकेळकर

डोंबिवलीत उलगडणार शब्दांचे महात्म्यरविवारी प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांचा स्त्रीधन कार्यक्रम रंगणारशेतीजन्य |डोंबि...
11/02/2022

डोंबिवलीत उलगडणार शब्दांचे महात्म्य

रविवारी प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांचा स्त्रीधन कार्यक्रम रंगणार

शेतीजन्य |डोंबिवली

निरक्षर स्त्रियांनी साकारलेल्या ओव्या, म्हणी, वाक्यप्रचार आणि उखाणे यांच्या खुमासदार कथा आणि रंजक कवितांचा स्त्रीधन हा कार्यक्रम रविवार १३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीकरांना अनुभवता येणार आहे. डोंबिवली पूर्वेत के. बी.विरा शाळेच्या पटांगणात साहित्य यात्रा, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ग्रंथोत्सवात रविवारी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे.

डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात ४ फेब्रुवारीपासून साहित्ययात्रा, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सवाला सुरुवात झाली आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत मराठीतील ४० हुन अधिक प्रकाशकांची मराठी आणि हिंदी भाषेतील हजारो पुस्तके पाहता आणि सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. या ग्रंथोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही प्रेक्षकांसाठी असणार आहेत. यातील पहिला 'स्त्रीधन' हा कार्यक्रम रविवार १३ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता रंगणार आहे. प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका दीपाली केळकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. स्त्रीधन या कार्यक्रमात निरक्षर महिलांनी निर्मिलेल्या ओव्या, म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे यांचे महात्म्य उलगडून सांगणार आहेत. महाराष्ट्र भर गाजलेला हा कार्यक्रम ग्रंथोत्सवाच्या निमिताने डोंबिवलीत अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोबतच पुढच्या रविवार २० फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण भविष्यातील खगोलीय घटनांचा वेध घेणार आहेत. तर २५ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ सुसंवादक धनश्री लेले शब्दमोती कार्यक्रमातून शब्दांचा प्रवास उलगडणार आहेत.

ज्ञानाची तुलना फक्त ज्ञानाशीच !खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन शेतीजन्य | डोंबिवली ज्ञानाची तुलना फक्त ज्ञानाश...
05/02/2022

ज्ञानाची तुलना फक्त ज्ञानाशीच !
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन

शेतीजन्य | डोंबिवली

ज्ञानाची तुलना फक्त ज्ञानाशीच होऊ शकते. कोणत्याही माणसांशी नाही, अशा भावना व्यक्त करीत वाढदिवसानिमित्त आयोजित ‘ग्रंथतुला’ सोहळ्यात स्वत:ला तोलण्यास नम्रपणे नकार देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही पारड्यात प्रत्येकी ५० किलो पुस्तके ठेवून ती सर्व ग्रंथसंपदा मराठी शाळांच्या ग्रंथालयांसाठी देण्याची घोषणा केली.

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना शहर शाखा, डोंबिवली आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील के.बी. विरा हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. रविवार, २७ फेब्रुवारीपर्यंत (मराठी भाषा दिन) सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात चाळीसहून अधिक नामवंत प्रकाशकांची हजारो पुस्तके मांडण्यात आली आहेत. ती पुस्तके विनामूल्य पाहण्याची आणि सवलतीच्या दरात खरेदी करण्याची संधी डोंबिवलीकरांना आहे.

शहराच्या हिताचे काही सकारात्मक उपाय असतील, तर नागरिकांनी कृपया सुचवावेत. आपण सर्वांनी मिळून ते प्रकल्प मार्गी लावूया, असे आवाहन खासदारांनी यावेळी केले. ग्रंथोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी के.बी.विरा हायस्कुलच्या पटांगणावर संध्य़ाकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका, सूत्र संचालिका दीपाली केळकर पारंपरिक ओव्या, उखाणे, म्हणींवर आधारित ‘स्त्रीधन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

शुक्रवार, २५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध सुसंवादिका धनश्री लेले आणि सहकारी शब्दमोती या मराठी भाषेतील अभिजात वाङमयातील शब्दमहात्म्य विषद करून सांगणार आहेत.

Address

Ambarnath
Ambarnath
421501

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918766990081

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shetijanya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shetijanya:

Share